Saturday, 27 February 2021

EMP बॉम्ब भाग-१



               सध्या जगात चर्चा आहे ती अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची. सध्याच्या घडीला सगळ्यांनाच ज्ञात असलेली सर्वात संहारक अस्त्र. अणुबॉम्ब हा ऍटॉमिक फ्युजन म्हणजेच अणुकेंद्रकांच्या विभाजनातून ऊर्जा उत्सर्जित करतो तर हायड्रोजन बॉम्ब हा ऍटमिक फिशन म्हणजेच अणुकेंद्रकांच्या एकीकरणातून ऊर्जा उत्सर्जित करतो. एक हायड्रोजन बॉम्ब हा त्याच क्षमतेच्या अणुबॉम्ब पेक्षाही १०० पटीने जास्त विध्वंसक असतो. पण ह्या बॉम्बचा आणखी वेगळ्या पद्धतीने आणखी संहारक वापर करता येऊ शकतो हे खूपच कमी जणांना माहित आहे. ते म्हणजे EMP बॉम्ब इलेक्ट्रो मॅग्नेटिक पल्स बॉम्ब...

               सगळ्यात आधी इलेक्ट्रो मॅग्नेटिक पल्स इफेक्ट काय ते पाहू. आपण सर्वांनी एक अनुभव घेतला असेल की रेडिओ किंवा टीव्ही च्या बाजूला मोबाईल ठेवला असेल आणि कोणाचा कॉल येत असेल तर रेडिओ, टीव्हीचा आवाज अडखळतो. ह्याला कारण असतात मोबाईल सिग्नल्स मध्ये असलेले इलेक्ट्रो मॅग्नेटिक पल्स. कोणत्याही conductor(संवाहक) पदार्थातून जेव्हा विजेचा प्रवाह जातो तेव्हाही हे पल्स तयार होतात. पण जेव्हा हे पल्स कमी प्रमाणात असतात तेव्हा त्यांचा फार काही परिणाम संभवत नाही. पण जसजसे ह्या पल्सचे प्रमाण वाढत जाते तसे ते पल्स प्रत्येक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण करायला सुरुवात करतात. कमी प्रमाणात असणारे पल्स हे फक्त त्या इलेक्ट्रीक उपकरणात बिघाड आणतात. जास्त प्रमाणात असणाऱ्या पल्समुळे स्पार्क निर्माण होतो. पेट्रोल इंजिनमध्ये असणारं स्पार्क प्लग हे नियंत्रित Electro Mangnetic Pulse चे उदाहरण. खूप मोठ्या प्रमाणात पल्स निर्माण झाले तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या vibrations मुळे मोठ्या बिल्डिंग, झाडं एका झटक्यात उध्वस्त करू शकतात. तसेच त्यामुळे निर्माण होणारी उष्णताही पर्यावरणावर आणि मानवी शरीरावर वाईट परिणाम करणारे असतात. ह्याच परिणामांचा वापर करून हा संहारक बॉम्ब बनवला जातो. बघायला गेलं तर अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब सारखा विध्वंस EMP बॉम्ब मुळे होत नाही पण जे परिणाम होतात ते अणुबॉम्ब, हैड्रोजन बॉम्बच्या परिणामांपेक्षा भयंकर असतात. अणुबॉम्ब एका झटक्यात सगळं संपवतो पण EMP बॉम्ब कॅन्सर सारखा एखाद्या प्रदेशाला कुरतडत जातो आणि ह्यामुळेच हा बॉम्ब अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब पेक्षा जास्त भयंकर आहे.

               २०१७ साली वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. उत्तर कोरियाकडून EMP हल्ल्याची शक्यता असल्यामुळे दक्षिण कोरियातील कंपन्यांनी त्यांची सर्व माहिती देशाबाहेर हलवली. बातमी तशी कोणाचे लक्ष वेधून न घेणारी. कोणी म्हणेल फारफार तर माहितीच ट्रान्सफर केली आहे ना... जिवितहानीचा उल्लेखही नाही... पण खरेच १०० तील ९० जणांना EMP बॉम्ब चं खरं स्वरूप माहितीच नसतं. चला तर पाहुयात काय आहे EMP बॉम्ब...



               जेव्हा एखाद्या संवाहक (Conductor) पदार्थातून विजेचा प्रवाह गेला की त्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र (Magnetic Field) तयार होते. ही फिल्ड स्पंदनांच्या (Pulse) च्या स्वरूपात असते. ह्या ElectroMegnatic Pulse चा वापर जसा चांगल्या गोष्टींसाठी होतो तसा तो विध्वंसासाठी केला जाऊ शकतो. पण हा EMP बॉम्बचा वापर नक्की होतो तर कसा...??? EMP बॉम्ब म्हणजे अणुबॉम्बचाच वेगळ्या पद्धतीने वापर... आजवरच्या इतिहासामध्ये दोनदा अणुबॉम्बचा वापर झाला आहे. हिरोशिमा आणि नागासाकी हि दोन्ही शहर क्षणांत बेचिराख झाली. पण जरा विचार करा हाच अणुबॉम्ब जमिनीवर न फोडता वर आकाशात फोडला तर... अशा अति उंचावर झालेल्या अणूस्फोटामधून निर्माण होणाऱ्या 'इलेक्ट्रो-मॅग्नेटिक पल्स'मुळे काही मायक्रोसेकंदातच 50000 व्हॉल्ट्स/मीटर इतकं प्रचंड मोठं इलेक्ट्रिक फिल्ड निर्माण होईल हे इलेक्ट्रिक फिल्ड त्या प्रदेशातील वीज पुरवठा करणारे पॉवर ग्रीड्स एका क्षणात निकामी करतील. त्याच बरोबर मोबाइल, टीव्ही, कॉम्पुटर, ए. सी. , वॉशिंग मशीन, कार असे जी उपकरणं मायक्रोप्रोसेसर, इंटिग्रेटेड सर्किट्स (IC) आणि विजेवर चालतात, वीज निर्माण करतात त्यातील सर्व सर्किट्स जळून जाऊन पूर्णपणे निकामी करतील.

               म्हणजेच संपूर्ण संपर्कव्यवस्था, दळणवळणाची साधन, बँकिंग व्यवस्था, वाहतूक यंत्रणा, एअरपोर्ट यंत्रणा, वितरण व्यवस्था पूर्णपणे ठप्प होईल. कोणाला कोणाशी संपर्क करता येणार नाही. पॉवर ग्रीड्स निकामी झाल्यामुळे वीजही नसेल. संपूर्ण पॉवर ग्रीड्स बदलणे ही खूपच किचकट आणि वेळकाढू प्रक्रिया आहे. फक्त पॉवर ग्रीड्स बदलून चालणार नाही तर ज्या प्रदेशावर असा हल्ला झाला त्या प्रदेशातील विद्युत प्रकल्पही कायमचे निकामी होतील. कारण पॉवर स्टेशन्समध्ये प्रत्येक गोष्ट हाताळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स वापरले जातात. एक पॉवर स्टेशन उभारायला वर्षे जावी लागतात पण तीच पॉवर स्टेशन एका क्षणात निकामी होतात. तसेच जमिनीवरून तसेच जमिनीखालून जाणाऱ्या विद्युतवाहक तारा, जागोजागी असणारे ट्रान्सफॉर्मर्स कायमचे निकामी होतात. आता कोणी म्हणेल की आम्ही जनरेटर चालवून वीज निर्मीती करू तर जनरेटरच्या अल्टरनेटरच्या वाइंडींग्स सुद्धा जळून खाक होतील. सध्याचे जनरेटर सुद्धा हे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्सवर चालतात. जे ह्या हल्ल्यात पूर्णपणे निकामी होतील. त्यामुळे तो पर्यायही उपलब्ध नसेल. ज्या प्रदेशावर असा EMP बॉम्बचा हल्ला होईल तेथील वीज पुरवठा पुर्णपणे पूर्ववत करण्यासाठी "कमीतकमी" पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. ह्यावरूनच ह्या EMP हल्ल्याची भयानकता लक्षात येईल.

               वीज नाही तर संपर्कव्यवस्था, दळणवळण, वाहतुकयंत्रणा निकामी होईल. बँकिंग व्यवस्था कोलमडल्यामुळे श्रीमंत असणारा एखादा माणूसही एका क्षणात भिकारी होईल. हॉस्पिटल्सला वीजपुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटर तसेच इतर यंत्रणा बंद पडेल. तसेच ह्या हल्ल्यामुळे हॉस्पिटल मधील इतर प्रगत यंत्रेही निकामी होतील. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना यातना सहन करत मरताना पहावं लागेल, त्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नसेल. नको नको त्या अफवांचे पीक उठेल. (भारत तर असा देश आहे की जिथे सगळं काही नॉर्मल असतानाही एका दिवसात लाखो अफवा पसरतात.) लोक एकमेकांच्या जीवावर उठतील. मोठया तोऱ्यात स्वतःला "मॉर्डन" म्हणवणारे आम्ही एका क्षणात अश्मयुगात जाऊन पोहचू.

               साधारणतः एका राज्यातील पॉवर ग्रीड्स निकामी झाल्या तर दुसऱ्या राज्यातील ग्रीड मधून वीज घेतली जाते पण EMP हल्ल्यामध्ये पॉवर स्टेशन, पॉवर ग्रीड पासून घरातील सर्किट बॉक्स पर्यंत सगळ्याच गोष्टी निकामी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्रदेशातूनही वीज घेता येणार नाही. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे ह्या हल्ल्यामुळे प्रभावित होणाऱ्या  प्रदेशाचे क्षेत्रफळ. आकाशात जेवढ्या उंचावर अणुस्फोट घडवला जाईल तितका EMP Pulse मुळे प्रभावित होणारा प्रदेश मोठा. एका कमी क्षमतेच्या अणुबॉम्बचा वापर करूनही संपूर्ण उत्तर अमेरिका खंड उध्वस्त केला जाऊ शकतो. कसा...??? ह्या आधी ह्या EMP बॉम्बची चाचणी झाली आहे का...??? पाहू पुढील लेखात....


-सुमित शिर्के


(वरील माहिती कोणत्याही प्रकारे दंतकथा, कल्पनाविलास नसून १००% वैज्ञानिक आधाराने मांडली आहे... तरीही काही शंका असेल तर Google महाराज जिंदाबाद...)

2 comments:

  1. 👍👏👏सोप्या शब्दात माहिती.

    ReplyDelete
  2. हो या खरंच दंतकथा नाहीत. हे पूर्णपणे वास्तव आहे. आणि तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे काम करत आहात. हे काम असंच पुढे चालू राहू द्या. कारण सर्वसाधारण लोकांना अजून या गोष्टी माहित नाहीत. त्या तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध

    ReplyDelete

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...