जगभर कोरोना कोविद-१९ ह्या आजाराने थैमान घातले आहे. चीनमधून हा रोग आता जगभर पसरला आहे. भारतातही ह्या रोगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे त्यांच्या परीने सर्व प्रयत्न आणि उपाययोजना कर आहेत तसेच जनतेलाही आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश अशी सगळी काळजी लोकांकडून घेतली जात आहे. पण हे सर्व झाले बाह्य उपचार... मास्कही कितीवेळ वापरणार. अर्थात मास्क वापरायचे आहेच पण एका ठराविक काळानंतर मास्कची ही व्यवस्थित विल्हेवाट लावावी लागेल. वेळोवेळी बदलावे लागेल. पण जर ह्या सर्व बाह्य उपचारांसोबत जर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहिली तर कोणत्याही रोगाचा सहज प्रतिकार करता येऊ शकतो.
आज जेव्हा ह्या विषयावर विचार करत होतो तेव्हा दहा वर्षे मागे गेलो. ६ मे २०१० रोजी
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात
प.पु. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू ह्यांनी
"रामराज्य २०२५" ह्या विषयावर प्रवचन केले होते. त्यात त्यांनी वैयक्तिक आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय प्रयत्न करायचे तेही सांगितले होते. पण आधी रामराज्य २०२५ ही संकल्पना समजून घेऊयात...
बापूंच्याच शब्दात सांगायचे झाले तर
"२०२५ रोजी रामराज्य आणणे, हे माझे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे..." पुढे बापू सांगतात, "पहिल्यांदा आम्हांला बघायचंय- रामराज्य म्हणजे नक्की काय..? 'राम कुठून तरी अवकाशातून खाली उरणार, २०२५ च्या त्रिपुरारी पौर्णिमेला तो राजसिंहासनावर बसणार? आम्ही चवऱ्या ढाळणार, फुलं उधळणार आणि मग आकाशातून देव पुष्पवृष्टी करणार?' असं काही होणार आहे का..? असा फालतुपणा मुळीच नाही. असा विचार माझ्या मनात दुरान्वयेही नाही. अशी स्वप्नही बघू नका... रामराज्य म्हणजे जसं राज्य रामाने अयोध्येत चालवलं, तसं राज्य. अयोध्येतील नागरिक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी समाजव्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे, तसा समष्टीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य आणि ते येणारच... १०८%
रामराज्य म्हणजे नक्की काय? प्रजा सुखी आहे प्रजा दुःखी नाही. प्रजा दुर्बल नाही, प्रजा दरिद्री नाही, प्रजा भुकेलेली नाही, प्रजा कोणाच्या शिव्या किंवा लाथा खात नाही असं राज्य म्हणजे रामराज्य..."
पुढच्या गोष्टी समजून घेण्यासाठी रामराज्य २०२५ ही संकल्पना समजून घेणे गरजेचे होते. रामराज्य २०२५ ह्या संकल्पाचे पाच स्तर आहेत त्यातील पहिला स्तर हा वैयक्तिक स्तर आहे. भारत सुदृढ व्हायचा असेल तर आधी प्रत्येक नागरिकाने सुदृढ व्हायला हवे. त्यासाठी प्रत्येकाने आरोग्यविषयक काय काळजी घ्यायला हवी ह्याचं सविस्तर विवरण डॉ. जोशींनी ह्या पहिल्या वैयक्तिक स्तरामध्ये केलं आहे. त्याच गोष्टी आजच्या काळात गरजेच्या आहेत. आपलं आरोग्य सुदृढ असेल तर मोठ्यातला मोठ्या आजाराला हरवता येतं. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी इथे सांगतो.
१. जलउपचार पद्धती:-
रोज सकाळी दात घासल्यानंतर मिठाच्या पाण्याने गुळण्या करून नंतर जलप्राशन करणे. सुरवातीला पन्नास एम.एल. पाण्याने सुरुवात करायची नंतर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार हे प्रमाण एक लीटर पर्यंत वाढवत न्यायचं. मुख्य म्हणजे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तासापर्यंत काही खाऊ नये. ह्यालाच जलउपचार पद्धती (वॉटर थेरपी) म्हणतात. अनेक शारीरिक व मानसिक आजारांना रोखण्याचा हा श्रेष्ठ उपाय आहे. ह्यामुळे जवळजवळ अनेक प्रकारचे विकार आणि आजार आधीच थांबविले जातात. रात्रभर झोपलेले असताना तोंड मिटलेले असते. त्यामुळे तोंडात अनेक अन-एरोबिक बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यांच्यामुळे अनेक विषारी मलद्रव्ये शरीरात जातात जी अनेक रोग उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. मिठाच्या पाण्याने चूळ भरल्याने आणि गुळण्या केल्याने घसा, गाल आणि हिरड्यांमधील असे घातक बॅक्टेरिया मरतात, कमीतकमी हतप्रभ तर नक्कीच होतात. रात्रभर शरीरात ज्या प्रक्रिया चालतात त्या दिवसांच्या प्रक्रियांपेक्षा वेगळ्या असतात. रात्रीच्या प्रक्रियांमुळे शरीरात जे विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) तयार होतात, त्यांना धुण्याचे काम फक्त पाणीच करू शकते. आणि ती टॉक्सिन्स जर शरीराबाहेर उत्सर्जित केली गेली नाहीत तर ह्यातून नानाविध आजार उत्पन्न होतात. आणि म्हणूनच शरीराला जशी बाहेरून अंघोळ घालणे महत्त्वाचे आहे, तशी आतून देखील आंघोळ घालणे महत्वाचे आहे आणि ती फक्त ह्या जलउपचार पद्धतीनेच होते.
२. मुबलक प्रमाणात पाणी पिणे:-
या पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे, त्याचप्रमाणे आमच्या शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे. शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी पाणी आवश्यक आहे. जर आपण नीट पाणी नाही प्यायलो तर काय होणार.? शरीरातील जुनं पाणी तसंच राहिलं आणि पाणी एकाच जागी साचून राहिलं तर ते खराब होतं. तसेच शरीरातील पेशींमधील व अवयवांमधील पाणी खराब होतं आणि इंद्रियांचं काम बिघडते. म्हणून दिवसातून कमीत कमी तीन लिटर आणि जास्तीत जास्त चार लिटर (याहून जास्त नाही.) पाणी प्रत्येकाने प्यायलाच पाहिजे.
३. सूर्यप्रकाश:-
दिवसाला कमीत कमी अर्धा तास किंवा दररोज शक्य नसेल तर आठवड्याला एकूण चार ते साडेचार तास सूर्यप्रकाश कसा मिळवता येईल ह्याची काळजी घ्यायला हवी. सूर्योदयापासून दुपारी १ पर्यंत किंवा दुपारी ३ पासून सूर्यास्ताच्या अर्धा तास आधीपर्यंत योग्य वेळ आहे. अशावेळी गॉगल किंवा टोपी वापरायला काही हरकत नाही. पण रेनकोट किंवा डोक्यावर छत्री घेऊन फिरू नका. त्याने सूर्यप्रकाश मिळणार नाही. फक्त सुर्यप्रकाशापासूनच आम्हाला व्हिटॅमिन डी मिळते. जे शरीरातील कमीत कमी ३६० वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी आवश्यक असते. सूर्यप्रकाश हाच एनर्जीचा ओरिजिनल सोर्स आहे. त्यामुळे मानवाच्या शरीरामधील सुद्धा अनके एंझाइम्स आणि बायोकेमिकल प्रॉडक्ट्स ह्यांच्या क्रिया सुर्यप्रकाशावर अवलंबून आहेत. शरीरातील अनेक क्रिया सुरळीत चालणे वा न चालणे हे सूर्यप्रकाशाच्या प्राप्तीवर अवलंबू असतात आणि म्हणूनच सूर्यप्रकाश कमी मिळणे हे स्थौल्याचे एक कारण आहे. नुसतं सूर्यप्रकाशात उभे राहणे आणि चालणे ह्यांच्यामध्ये फरक आहे. चालण्याने सूर्यप्रकाशापासून अधिक फायदा मिळतो. केवळ उभे राहण्याने त्याच्या पन्नास टक्केच फायदा मिळतो.
४. फळं खाणे:-
फळं खाणं म्हणजे फक्त आंबा, फणस आणि केळी खाणे नव्हे. त्याच्यापुढे आम्हाला काही दिसतंच नाही. फळ हेच मानवाचं मुख्य अन्न आहे, हे लक्षात ठेवा. मानवाची सर्व डायजेस्टिव्ह एनझाइम्स की फळं पचवणारी एनझाइम्स आहेत. फळ ओज वाढवणारे आहे. फळं खाण्याने स्त्री-पुरुष दोघांसाठी आवश्यक असणारे बदल त्यांच्यात उचितपणे होतात. सकाळी नाश्त्याच्या वेळी, रात्री जेवणानंतर नानाविध फळं खावीत. जी सालीसकट खाण्याची फळे आहेत ती सालीसकट खावीत. फळांच्या सालीमध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स, सेलेलिअम, कोबाल्ट ही द्रव्य असतात. जी आम्हांला इतर पदार्थांतून मिळत नाहीत. फळं परवडत नाहीत असे काही जण म्हणतात पण जी फळं महाग नाहीत ती खा. ऋतूनुसार मिळणाऱ्या बोरं, करवंद, आवळा, चिंच, जांभूळ ह्या सर्व फळांमध्येही मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. पण ती खायच्या आड आमचं स्टेटस येत. जास्त पिकलेलं केळं आम्ही टाकून देतो, पण त्यामध्येच मुबलक प्रमाणात चांगले बॅक्टेरिया असतात ज्याची आपल्या शरीराला गरज असते. अनेक चांगले व्हिटॅमिन्स, ट्रेस एलिमेंट, सेलेनियम, क्रोमिअम वगैरे जी शरीरात नॅनोग्राम्समध्ये आवश्यक आहेत ती फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतात. उदा. "क" जीवनसत्त्व.
५. थोडं मांसाहाराबद्दल:-
जवळा आणि बांगडा... जवळ्यामध्ये आणि बांगड्यामध्ये मॅक्सिमम चांगल्या गोष्टी आहेत. फिशमधील मोदके हा प्रकार खूपच कमी लोकांना माहीत आहे. माशांमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ असतात ज्यांच्यामुळे माणसाच्या शरीरात खूप मोठे आणि चांगले बदल घडून येतात. ते कुठल्याही शाकाहारी अन्नामध्ये नसतात. शाकाहारी लोकांनी मांसाहारी बना, असा ह्याचा अर्थ मुळीच नाही. ह्यालाही एक मार्ग आहे. ज्यांना मांसाहार करता येणार नाही त्यांनी तिळाचे तेल वापरावे. "एच.डी.एल कोलेस्ट्रॉल" (चांगले कोलेस्ट्रॉल) हे काही मोजक्या फळांमध्ये, त्यांच्या सालींमध्ये, तीळामध्ये आणि तिळाच्या तेलामध्ये असते. हे वाईट कोलेस्ट्रॉलचा नाश करते म्हणजे हार्ट अटॅक पासून आमची सुटका करते. "एचडीएल" आणि ओमेगा ३ हे तिळाच्या तेलात आहे, फ्लेक्स सीड ऑईलमध्ये आहे, सगळ्या माशांमध्ये आहे. पण जेव्हा मासा आम्ही डीप फ्राय करतो आणि भरपूर मसाला लावून खातो, तेव्हा ओमेगा ३ आणि एचडीएल नष्ट होतात. त्यामुळे कमीत कमी तेलात तळावे किंवा फिशकरी खावी. तेलाशिवाय सुद्धा फिश चांगले उकडण्याचे अनेक प्रकार आहेत.
अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत पण एकाच लेखात त्या सांगायचा प्रयत्न केला तर लेख खूपच लांबलचक होईल. त्यामुळे ह्या विषयाचे दोन भाग केले आहेत. पुढील भागाची सुरुवात सगळ्यांना नावडत्या पण आवश्यक असणाऱ्या गोष्टीपासून करणार आहोत. तो गोष्ट म्हणजे कढीपत्ता. हा कढीपत्ता एका मोठ्या दुर्धर आजारावर गुणकारी औषध आहे. त्याबद्दल पाहुयात पुढील लेखात...
सौजन्य:
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, Md. Medicine
(रामराज्य २०२५)