Sunday, 13 September 2020

आमचं काय चुकलं..???


भारताचं गतवैभव परत येईल का..??? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

नक्कीच येईल. पण त्यातील बऱ्याचश्या गोष्टी आपल्या हातात आहेत.

               रामावतर आणि कृष्ण अवतारानंतर खऱ्या अर्थाने भारतात रामराज्य नांदल असेल तर समुद्रगुप्ताच्या काळात. समुद्रगुप्ताच्या काळात भारतात रामराज्यानंतर कधीही नव्हती इतकी संपन्नता होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी तेच रामराज्य हिंदवी स्वराज्याच्या रूपाने स्थापन केलं आणि वाढवण्याचा अथक प्रयास केला. आमच्या पहिल्या दोन छत्रपतींचे आयुष्य शंभरीचे असते तर आज भारताचा इतिहास वेगळ्या स्वरूपात लिहिला गेला असता. पण इतिहासात जर तर ला जागा नसते.

               आमची दुर्दशा का झाली..??? कारण आम्ही ह्या देशाचे मूळ नागरिक असणारे हिंदू जातीपतींमध्ये विभागले गेलो. धार्मिक कर्म एकाच वर्गाची ठेकेदारी बनली. का..??? कारण आम्ही सांघिक उपासना विसरलो. पुर्वीच्या काळी भलीमोठी देवालये उभारली जायची. देवालयांना भलेमोठे सभामंडप असायचे. ते का..?? आमच्याकडे तेव्हा पुष्कळ जागा होती म्हणून..??? नाही... त्याकाळी जातीपाती बाजूला सारून त्या देवलयांमध्ये सांघिक उपासना व्हायच्या. मुळात जात नावाची गोष्टच नव्हती. जात ह्या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये जन्म असा होतो. (या देवी सर्वभूतेषु जातिरुपेन संस्थितां| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः|| जाति - जन्म) त्याकाळी देशात वर्ण होते, तेही ज्याच्यात्याच्या कर्मानुसार. जातीने म्हणजेच जन्माने क्षुद्र असणारा जर अध्यापनाचे, धार्मिक विधींचे काम करू लागला तरी तो ब्राह्मणच गणला जायचा. आम्ही सांघिक उपासना विसरलो तेव्हापासून आमची गल्लत सुरू झाली. आमच्यातला एकोपा संपला आणि आम्ही सर्व सनातन वैदिक धर्मीय वेगवेगळ्या जातीत विभागलो गेलो. तिथून आमच्या दुर्दैवाला सुरुवात झाली.

               देशाची ही परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या भागातील अनेक संतांनी केले. आम्ही त्यांचे उपदेश किती मानले.? आज वारकरी संप्रदाय सोडला तर बाकीचा हिंदू समाज किती सांघिक उपासना आणि भजन-कीर्तनात सहभागी होतो.? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम महाराजांनी भजन किर्तन आणि विठ्ठल भक्तीचे महत्व पटवून दिले. समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना सुरू केली, गावोगावी आखाडे सुरू केले. रामदासी संप्रदाय उभारला. ह्या रामदासी संप्रदायाने महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये खारीचा वाटा उचलला होता. त्यानंतर काय..??? आम्हांला ह्या गोष्टी पटवून देण्यासाठी संतांनी जीवाचे रान केले आणि आम्ही त्यांचे उपदेश विसरत गेलो...

               वैभव पुन्हा मिळवायचे असेल देशातील हिंदू समाजाने जातीपाती विसरून एक व्हायला हवं, ही गोष्ट ओळखून डॉ. बळीराम हेगडेवार ह्यांनी 95 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज संघाच्या कोणत्याही शाखेत जा तिथल्या स्वयंसेवकांना त्यांची जात विचारा. फक्त "हिंदू" इतकंच उत्तर येईल.. पण आम्ही आज काय करतो. ऐकीव गोष्टींवर संघाला शिव्याशाप देतो. किती जणांनी संघाचा इतिहास, संघाचे कार्य जाणून घेण्याचा प्रयास केलाय. शंभरात एखादं दोन जण मिळतील. आज एक अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधान पदावर आहे जी तुम्हांला आम्हांला आपण कोण होतो आणि काय आहोत ह्याची जाणीव त्याच्या वागण्यातून करून देतोय. तो माणूस आज अश्या एका जबाबदारीच्या पदावर आहे की तो आम्हांला बोलून काही गोष्टी सांगू शकत नाही पण तो रोज त्याच्या वागण्यातून तुम्हांला आम्हाला जागं करण्याचा प्रयत्न करतोय. पण आम्हांला आमची झोप काही सोडवत नाही.

               येणाऱ्या काळात देशाला एका मोठ्या संभाव्य बदलाला सामोरं जावं लागू शकत. पण आमची आधीची इतक्या शेकडो-हजारो वर्षांची सवय पाहता तो बदल लोकं कसा स्वीकारतील ह्याबाबत मला थोडी साशंकता आहे. मला नेहमीच ज्यू समाजाचे आणि इस्रायलने कौतुक वाटते. हजारो वर्षे त्यांच्या मूळ भूमिपासून दूर राहूनही त्यांची त्यांच्या धर्माप्रती आणि त्यांच्या भूमीसाठी असणारी आत्मीयता पिढ्यानपिढ्या कायम राहिली. त्यांनी त्यांची भूमी परत मिळवलीही आणि प्राणपणाने जपलीही. आता इस्रायलने त्यांचं एकमेव पवित्र मंदिर पुन्हा उभारण्याची जय्यत तयारी केली आहे.

                 आम्हीही आमचं राम मंदिर परत मिळवलं. पण ही एकच गोष्ट झाली. ज्यू समाजाच्या अनेक पिढ्या त्यांच्या मूळ भूमीच्या बाहेर जन्मल्या आणि तिथेच संपल्या पण त्यांची त्यांच्या भूमीप्रती श्रद्धा कणभरही ढळली नाही. त्याच्या उलट आम्ही आहोत. आम्ही आमच्याच भूमीत जन्मलो आणि इथेच संपलो पण कधीही जातीपाती विसरून आमच्या मायभूमीसाठी एकत्र आलो नाही. एक राम मंदिर उभारले म्हणजे रामराज्य येणार नाहीये. रामराज्य येण्यासाठी आम्ही एकत्र यायला हवं त्यासाठी आधी आम्ही एकत्र येऊन पुन्हा सांघिक उपासना सुरू करायला हव्यात. येत्या काळात तिसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यासोबतच सर्व भारतीयांना एका संभाव्य अभूतपूर्व बदलाला सामोरे जावे लागेल. पण एक खात्रीशीर सांगू शकतो. ह्यापुढे होणारा प्रत्येक बदल भारताचे गतवैभव परत मिळवून देणारा असेल. आता फक्त प्रश्न आपला आहे आम्ही ह्या बदलांना कसा प्रतिसाद देतो आणि आमचा एकोपा कसा जपतो.


©सुमित शिर्के.

खारघर.

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...