Thursday, 14 July 2016

नॉस्त्रादेमसची भाकिते : भविष्यकथनाची पद्धत


Tripod seated at night in secret study
Only resting on the aerian saddle :
Tiny flame leaving the solitude
Make prosper what is not vain to believe.

       "सगळीकडे रात्रीची निरव शांतता पसरत आहे.
         मी एकांतात माझ्या अभ्यासिकेत आरामखुर्चीवर पहुडलोय.
         एक चिमुकली तेजोमय ज्योत अंधार्‍या भविष्यात एकटीच चमकताना दिसते आहे.
          माझी साधना व्यर्थ ठरली नाही.... "

          'सेंच्यरीज' ह्या ग्रंथातील गूढ भाषेत नॉस्त्रादेमसने रचलेली ही पहिली चतुष्पदी. नॉस्त्रादेमस रात्रीच्या निरव शांततेत अभ्यासिकेतील आरामखुर्चीत पहुडले आहेत. भविष्याचा संपुर्ण गोषावरा त्यांच्यासमोर आहे. मानवजातीच्या भविष्यातील पुढील अनेक संकटे त्यांनी पाहिली. ह्या चतुष्पदीतील 'तेजोमय ज्योत' म्हणजे 'मानवजातीच्या उद्धारासाठी झटणारे महान सत्पुरुष'. मानवजातीचे भविष्य संघर्षमय असले तरी मानवाच्या कल्याणाची योजनाही देवाने आधीच करून ठेवली आहे, हे समजल्यामुळे नॉस्त्रादेमस निश्चिंत आहेत. म्हणूनच ते पुढील ओळीत लिहितात, 'माझी साधना व्यर्थ ठरली नाही'.
            नॉस्त्रादेमस पुढील चतुष्पदीमध्ये लिहितात-
        The rod in the hands placed in the middle of Branches
        With the wave he moistens and the hem and the foot :
        A fear and voice trembling from the handles :
        Divine splendour. The divine is seated nearby.

       "समोरील पितळी परातीतील पाणी हातातील छडीने हलवले.
        तरंग निर्माण होऊन पाणी धूसर होत गेले.
        त्यात हळूहळू चलचित्रे दिसू लागली.
        संपुर्ण अभ्यासिका दाट धुक्याने भरली आणि शेजारी बसलेल्या देवदूताने दिसणार्‍या घटनांचे स्पष्टिकरण सांगितले."

             आपण  आधीच पाहिले आहे कि, जेरुसलेममधील गूढ ग्रंथ अचानक गायब झाले. त्या ग्रंथांमध्ये परातीत पाणी किंवा तुप ओतून भविष्य पाहण्याची गूढविद्या होती. जेरुसलेमच्या पाडावानंतर तेथील ज्यू लोक इतरत्र स्थलांतरीत झाले. नॉस्त्रादेमस हे ह्याच ज्यू लोकांचे वंशज होते. त्यांच्या आजोबांनी त्यांना दिलेला ग्रंथभांडार हा जेरुसलेमच्या मंदिरातील गूढ ग्रंथसंग्रह असावा, असे जाणकारांचे मत आहे.
             रोज मध्यरात्री ह्याप्रमाणे नॉस्त्रादेमस एकाग्र चित्ताने-समाधी अवस्थेत भविष्यात घडणारा घटनाक्रम बघून-समजून चतुष्पदी लिहीत. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये महर्षी तपसमाधी घेऊन सिद्धी प्राप्त करीत, तसाच काहीसा हा प्रकार. चतुष्पदी लिहिताना स्वतःच्या अवस्थेबद्दल नॉस्त्रादेमस लिहीतात. तिसर्‍या शतकातील दुसरी चतुष्पदी-
        The divine word will give to the substenance,
        Including heavenm earth, gold hidden in the mystic milk:
        Body, soul, spirit having all power,
        As much under its feet as the Heavenly see.

        "दैवी वाणी सार्‍या विश्वाला नियंत्रित करणारी...
         त्या गूढ शक्तीत (mystic milk) सर्वकाही...
         शरीर, प्राण, आत्मा त्या शक्तीने प्रेरीत...
         सारे विश्व माझ्या पायाशी......"
      
           दैवी वाणीचा उल्लेख पहिल्या ओळीत येतो.  अर्थात देवदूताने सांगितलेले सर्व भविष्य हे ईश्वरी इच्छेनुसार सांगितले आहे. त्या ईश्वरी इच्छेनुसारच विश्वामध्ये सर्वकाही घडते. दुसर्‍या ओळीतील गूढ शक्तीला नॉस्त्रादेमसने ग्रंथामध्ये अनेकवार 'नियती' संबोधले आहे. तिसर्‍या ओळीतील अवस्था समाधी अवस्था दर्शवते. समाधी अवस्थेत आत्मा शरीराबाहेर येऊन अंतराळात संचार करतो, असे योगसाधनेचे जाणकार सांगतात. तशीच काहीशी अवस्था नॉस्त्रादेमसची असावी म्हणून ते चौथ्या ओळीत लिहितात," सारे विश्व माझ्या पायाशी.."
          आपण ह्याआधी बघितलच आहे कि, नॉस्त्रादेमसनी सर्व भाकिते गूढ अर्थाने लिहिली आहेत. त्याबद्दलचं विश्लेषण स्वतः नॉस्त्रादेमसनी त्यांच्या मुलाला सेजरला लिहिलेल्या पत्रात दिले आहे. ते पत्र आपण थोडक्यात पाहूयात-
"प्रिय पुत्र सेजर,
     अनेक आशिर्वाद.
              तुझा जन्म ईश्वरी इच्छेनुसार खूपच उशीरा झाला आहे. माझ्या लिखाणाचं काम मी पुर्ण केलं आहे. तु जाणता होईपर्यंत मी ह्या जगात नसेल. म्हणून हे पत्रलेखन....
               मानवसमाजात घडणारे भविष्यकथन मी मुद्दाहून गूढ सांकेतिक भाषेत लिहिले आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, ह्या भविष्यकथनातील अनेक घटना सध्याच्या काळात(इ.स.१५५५) अगम्य आणि विक्षिप्त आहेत. त्यामुळेच हे लिखाण सध्याच्या राजसंस्थेला आणि धर्मसंस्थेला न पटणारे आहे. हे भविष्य सुसंगत आणि तारीखवार मांडले असते तर दुखावलेल्या ह्या संस्थांकडून माझे लिखाण नष्ट करण्यात आले असते आणि मला पाखंडी ठरवून जबरदस्त शिक्षा ठोठावली असती.
                दुसरे कारण म्हणजे, जर मी हे भविष्य सुसंगत आणि तारीखवार लिहले असते. ते चुकिच्या माणसाच्या हाती लागले, तर अनर्थ ओढावेल. तो धोका टाळण्यासाठी मी हे लिखाण गूढ भाषेत लिहीले.
                त्याचबरोबर तारीखवार काहीही न लिहिता त्या त्या दिवसाचे ज्योतिषी ग्रहभ्रमणाचे गणित मांडून लिहिले आहे. पण स्थळांचा आणि शहरांचा स्पष्ट उल्लेख आहे. हे ग्रहभ्रमणाचे गणित तोच ज्योतिषी उलगडू शकतो, ज्याच्या साधनेला दैवी उपासनेची जोड आहे. त्यामुळे कोणीही स्वार्थी मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी ह्याचा वापर करू शकणार नाही. 
                माझ्या लाडक्या पुत्रा, परमेश्वरी इच्छेने लिहिलेले हे लिखाण मी तुझ्या स्वधीन करत आहे. ह्यातील सर्व गोष्टींचे तुला व्यवस्थित आकलन होवो. त्यासाठी सर्वसमर्थ परमेश्वर तुला बुद्धी देवो. त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेव. तुला सुखशांती आणि दिर्घायुष्य लाभो."
                 नॉस्त्रादेमसनी त्यांच्या पत्रामध्ये संपुर्ण विवेचन दिले आहे. त्यांच्या दोन्ही भीती सार्थच होत्या. गेलिलीओ गेलिलीने सुर्य पृथ्वीभोवती फिरतो ह्या पारंपारिक संकल्पनेला छेद देत पृथ्वी सुर्याभोवती फिरते ही संकल्पना मांडली होती. तेव्हाच्या धर्मसंस्थेने त्याला पाखंडी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. आपल्याकडचे उदाहरण पहायचे झाल्यास संत तुकाराम महाराजांना रुढी विरोधात जाऊन लिखाण केल्यामुळे गाथा इंद्रायणी नदीत बुडवावी लागली होती. दुसरी भीती, चुकीच्या व्यक्तींकडून फायदा उचलला जाण्याची तर प्रत्यक्ष हिटलरने नॉस्त्रादेमसच्या भाकितांचा चुकीचा वापर केला होता. त्याबद्दल आणि चतुष्पदींमधील ग्रहभ्रमण गणिताचं विवेचन लेखमालेच्या ओघात पुढे येईलचं.
                आपण आता नॉस्त्रादेमसच्या भविष्यकथनाच्या पद्धतीचा अभ्यास केला. पुढे आपण फ्रेंच राज्यक्रांती, भारताचा १८५७चा स्वातंत्रलढा, दुसरे महायुद्ध, भारतीय नेत्यांबद्दलची भाकिते, तिसरे महायुद्ध आणि सर्वात महत्वाचे तिसर्‍या महायुद्ध काळातील नव्या सर्वसमर्थ भारतीय नेत्याविषयीच्या नॉस्त्रादेमसच्या भाकितांचा क्रमवार अभ्यास करणार आहोत. पुढील लेखात फ्रेंच राज्यक्रांती बद्दल पाहू. कारण फ्रेंच राज्यक्रांतीतूनच भारतीय विचारवंतांनी प्रेरणा घोतली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पडली. तसेच नॉस्त्रादेमसनी फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल लिहिलेल्या चतुष्पदी खुप रोचक आहेत...
अंबज्ञ.

No comments:

Post a Comment

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...